संभाजी ब्रिगेडच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे म्हणजे अलौकिक प्रतिमेचे आदर्श उदाहरण – सतीश काळे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संपूर्ण महाराष्ट्रभर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी होत असताना आज पिंपरी चिंचवड येथील निगडी येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन प्रवासावर संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष सतीश काळे यांनी त्यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला सतीश काळे म्हणाले १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावात झाला.अण्णाभाऊ साठे दीड दिवस शाळेत गेले असले तरी त्यांनी मोठी ग्रंथ संपदा निर्माण केली. उच्चवर्णीयांच्या अन्यायामुळे आणि छळामुळे त्यांनी शाळा सोडली. परंतु त्यांच्यामधील प्रतिभावंत साहित्यिक जिवंत राहिला आणि त्यांनी १९५९ मध्ये फकिरा सारख्या कादंबरीचे लिखाण केले. त्यांनी लिहिलेल्या 35 मराठी कादंबऱ्यांपैकी एक फकीरा आहे. १९६१ मध्ये तिला सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठी राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला. अण्णाभाऊ साठे यांच्या कथासंग्रहातील १५ लघुकथा २७ विविध भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. पुस्तके आणि कथा लिहिण्याबरोबरच अण्णाभाऊ साठे यांनी मराठी पोवाडे, पटकथा,अनेक गाणी आणि असंख्य रशियन नाटकांची निर्मिती केली आहे.
लोकशाहीवादी अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, स्वतंत्र मराठी भाषिक राज्य बॉम्बेची स्थापना केली. १९५८ मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी जागतिक रचनेत कामगार वर्ग आणि दलित वर्गाचे महत्त्व स्पष्ट केले. जेव्हा ते म्हणाले की,“पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर विसावत नाही, तर दलित आणि कष्टकरी लोकांच्या तळहातावर तरलेली आहे”
अण्णाभाऊ साठे यांना संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे शहर सचिव रावसाहेब गंगाधरे शहर कार्याध्यक्ष दिनेश मराठे उपाध्यक्ष एकनाथ जगताप संघटक विजय पाटील,उमेश सावंत,जगदीश यादव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.









