संतांनी फकिरी वृत्तीने समाजप्रबोधन केले! – ह. भ. प. किसनमहाराज चौधरी
डॉ. पी. एस. आगरवाल लिखित 'फकीर गुरू' पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -‘स्वत: कफल्लक राहून संतांनी फकिरी वृत्तीने समाजप्रबोधन केले. ‘फकीर गुरू’ तोच कित्ता गिरवत आहे!’ असे विचार ह. भ. प. किसनमहाराज चौधरी यांनी पिंपळे गुरव येथे व्यक्त केले.
प्रणाली प्रकाशन आणि दिलासा साहित्य सेवा संघ आयोजित तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पी. एस. आगरवाल लिखित ‘फकीर गुरू’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात किसनमहाराज चौधरी बोलत होते. वृक्षमित्र अरुण पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच साहित्यिक सुभाष चव्हाण, गुणवंत कामगार संदीप पोलकम, डॉ. पी. एस. आगरवाल,प्रकाशिका शामला पंडित, दिलासाचे संस्थापक – अध्यक्ष सुरेश कंक यांची व्यासपीठावर आणि ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे, शोभा जोशी, अशोकमहाराज गोरे, कैलास भैरट, जयश्री श्रीखंडे, जयश्री गुमास्ते, नीलेश शेंबेकर, बाळकृष्ण अमृतकर, अण्णा जोगदंड, आनंद मुळूक, हेमंत जोशी, भाऊसाहेब गायकवाड, भरत शिंदे यांची सभागृहात प्रमुख उपस्थिती होती.
ह. भ. प. किसनमहाराज चौधरी पुढे म्हणाले की, ‘गुरू अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाची प्रकाशवाट दाखवत असतो!’ सुभाष चव्हाण यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. सुरेश कंक यांनी “हवा के साथ साथ…” आणि “सुन के तेरी पुकार…” या गीतांच्या माध्यमातून पुस्तकावर मार्मिक भाष्य केले. याप्रसंगी डॉ. पी. एस. आगरवाल यांनी आपल्या मनोगतातून, ‘देशात, जनतेत आणि शासनात बोलघेवड्यांचा सुकाळ आला असून कृतिशील व्यक्तींचा दुष्काळ आहे. त्यामुळेच समाजातील अनाचार, अनीती अन् भ्रष्टाचार यावर ‘फकीर गुरू’ या काल्पनिक नायकाच्या माध्यमातून भाष्य केले आहे!’ अशा भावना व्यक्त केल्या. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. तानाजी एकोंडे यांनी प्रास्ताविकातून ‘फकीर गुरू’ या पुस्तकाची निर्मितीप्रक्रिया उलगडून सांगितली; तर शामला पंडित यांनी समाजमाध्यमातील लेखन पुस्तकरूपात प्रकाशित करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. यावेळी मुखपृष्ठावरील फकीर गुरूच्या प्रतिमेत असलेल्या संदीप पोलकम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
शरद काणेकर, सूर्यप्रकाश आगरवाल, खुशबू आगरवाल यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. शामराव सरकाळे यांनी आभार मानले.









