लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा! आजपासूनच आचार संहिता लागू

नवी दिल्ली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. त्रिसदस्यीय निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचार संहिता लागू झाली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांच्या जोर बैठकांना अधिकच जोर येणार आहे. राजकीय समीकरणांचीही जुळवाजुळव जोरात होणार आहे.
त्रिसदस्यीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. कोणत्या राज्यात किती टप्प्यात मतदान होईल, निकाल कधी लागेल, देशातील एकूण मतदार किती? स्त्री आणि पुरुष मतदार किती? नव मतदार किती? संवेदनशील मतदारसंघ किती? या सर्वांची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.
सात टप्प्यात मतदान
पहिला टप्पा – 19 एप्रिल
दुसरा टप्पा – 26 एप्रिल
तिसरा टप्पा – 7 मे
चौथा टप्पा – 13 मे
पाचवा टप्पा – 20 मे
सहावा टप्पा – 25 मे
सातवा टप्पा – 1 जून
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. पत्रकार परिषद घेऊन राजीव कुमार यांनी ही घोषणा केली. तसेच निवडणुकीत कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे, याची माहितीही दिली आहे. देशात नव मतदार आणि महिला मतदारांची संख्या वाढल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच निवडणुकीत गडबड करणाऱ्यांची खैर राहणार नाही, असंही त्यांनी निक्षून सांगितलं.













