लाडकी बहीण योजना काढण्यापेक्षा बहीण माझी सुरक्षित हे अभियान राबवा – दुर्गा भोर

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लाडकी बहीण योजना काढण्यापेक्षा बहीण माझी सुरक्षित हे अभियान काढल्यास महाराष्ट्रातील अनेक महिला विद्यार्थिनी तरुणी यांच्यावर होणारे अन्याय थांबतील, अशी मागणी दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज महाराष्ट्रात अनेक महाविद्यालय शाळा तसेच अनेक आस्थापने शासकीय कार्यालय आयटी विभाग घरगुती हिंसा अशा अनेक प्रकारच्या ठिकाणी महिला तरुणी या त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारामुळे त्रस्त आहेत. शाळा कॉलेज इत्यादी परिसरात फक्त पोलीस शाळेमध्ये आल्याचे फोटो काढून निघून जातात.
प्रत्यक्ष शाळेमध्ये फेरफटका मारणे आवश्यक असून त्यामुळे विद्यार्थिनींना आत्मविश्वास निर्माण होऊन अनेक समस्या मार्गी लागू शकतात त्यांना कोणत्याही त्यांना पूर्णतः मदत शासनाकडून प्रयत्न होत नाही. आणि अत्याचारांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते महाराष्ट्राचे बिहार होऊ नये ही भीती महाराष्ट्रातील जनसामान्य महिलांच्या मनामध्ये भरलेली दिसते. आपल्या मुलींना शाळेमध्ये पाठवताना किंवा कॉलेजमध्ये पाठवताना आपल्या मुलींवर कोणते प्रसंग उद्भवतील या विचाराने आठ तास घरी पालकांचा जीव जागेवर नसतो सतत आपल्या मुलींची काळजी त्यांच्या मनात भेडसावत असते.
बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर कोर्टाची पायरी चढण्यास सांगितले जाते. फक्त नोंद घेऊन परंतु सदर आरोपीला फरार घोषित करून किंवा सायबर क्राईम मध्ये आपला फोन नंबर बदलून दुसरा फोन घेण्याच्या सूचना दिल्या जातात. परंतु मूळ प्रश्नाला वाचा फुटणे आवश्यक असून यासाठी राज्यांमध्ये विशेष महिला पोलीस दलाची निर्मिती होणे आवश्यक आहे असे दुर्गा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष दुर्गा भोर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.









