येवला येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा राजेंद्र घावटे प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) : येवला येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा “राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार” वितरण समारंभ नुकताच कोपरगाव येथे संपन्न झाला. पिंपरी चिंचवड मधील लेखक राजेंद्र घावटे यांना प्रथम पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
पाठ्यपुस्तकातील कवी प्रा. शशिकांत शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य भाऊसाहेब गमे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य भरत बिडवे, प्रा. रविंद्र मालुंजकर, कारागृह अधीक्षक रेवणनाथ कानडे, लेखिका डॉ. पल्लवी परुळेकर, आय ए एस अधिकारी प्रियांका मोहिते, कवयित्री वंदना इंनानी यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्ष संजय वाघ यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत वाघ आणि राजेश वाघ यांनी स्वागत केले. राज्यभरातून आलेल्या साहित्यकृतींवर पुष्पवृष्टी करून आणि कु. ओवी काळे हिने गायलेल्या शिवरायांच्या पोवाड्याने आगळ्या वेगळ्या पद्धतीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल ता.येवला, जि नाशिक आयोजित शहादू शिवाजी वाघ यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून कविता संग्रह- ४७ , कथा संग्रह-१७, कादंबरी -५ आणि ललित लेखसंग्रह- ११ अशा एकूण ८० विविध प्रकारच्या साहित्य कलाकृती प्राप्त झाल्या होत्या.
प्राप्त कलाकृतीतून प्रत्येक साहित्य प्रकारातील एका कलाकृतीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. ललित लेखनासाठी पिंपरी चिंचवडचे लेखक राजेंद्र घावटे यांच्या “चैतन्याचा जागर” या ललित व वैचारिक संग्रहाला, गंगापूर, जि. छ. संभाजीनगरचे कवी संतोष आळंजकर यांच्या “हंबरवाटा” या कवितासंग्रहाला, टेंभुर्णी, जि सोलापूर येथील हरिश्चंद्र पाटील यांच्या “ओवाळणी” या कथासंग्रहाला, आणि पुणे येथील लेखक देवा गोपीनाथ झिंजाड यांच्या “एक भाकर तीन चुली” या कादंबरीला सर्वोत्कृष्ट साहित्य कलाकृतींचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
चारही पुरस्कारांच्या निवडीसाठी साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी परिक्षण केले आहे.
काव्यलेखनासाठी सत्कार करण्यात आले. दुसऱ्या सत्रात बहारदार कविसंमेलन पार पडले. या प्रसंगी नगर, नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई, सोलापूर, लातूर, बुलढाणा, नांदेड, नागपूर येथील साहित्यिक आणि साहित्यरसिक मोठ्या संख्येने उपास्थित होते.
“चैतन्याचा जागर” या पुस्तकाला हा दुसरा मोठा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. शहरातील साहित्यिक आणि सामाजिक संस्थांनी राजेंद्र घावटे यांचे विशेष अभिनंदन केले आहे.













