‘मैं ना भूलूंगा…’ मैफलीद्वारे स्वर्गीय मनोजकुमार यांना सांगीतिक श्रद्धांजली

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नुकतेच काही दिवसांपूर्वी दिवंगत झालेले ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री मनोजकुमार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शब्दधन काव्यमंचाच्या वतीने ‘मैं ना भूलूंगा…’ या विशेष सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. हरि ओम निवास, भालेकरनगर, पिंपळे गुरव येथे संपन्न झालेल्या या मैफलीत मनोजकुमार यांची चित्रपटसृष्टीतील वाटचाल, त्यांनी केलेला संघर्ष अन् लाभलेले देदीप्यमान यश; तसेच त्यांच्या वाट्याला आलेले मानसन्मान याविषयीचे रंजक किस्से कथन करण्यात आले. या उत्कंठावर्धक किस्से आणि हकिकतींसोबत
मनोजकुमार यांच्यावर विविध चित्रपटांमध्ये चित्रीत झालेल्या एकल अन् युगुलस्वरातील सुरेल गीतांच्या सादरीकरणातून त्यांना सांगीतिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मैफलीत संजय गमे यांनी, ‘प्रीत जहाँ की रीत सदा…’ (पूरब और पश्चिम),
मैं ना भूलूंगा…’
(रोटी कपडा और मकान), ‘दिवानों से ये मत पूछो…’ (उपकार),
दीपक शर्मा यांनी, ‘दूर रहकर ना करो बात करीब आ जाओ…’ (अमानत),
‘रहा गर्दिशोंमें हरदम मेरे इश्क का सितारा…’ (दो बदन),
‘पत्थर के सनम तुझे हमने…’ (पत्थर के सनम), सुभाष चव्हाण यांनी, ‘कोई जब तुम्हारा हृदय तोड दे…’ (पूरब और पश्चिम), ‘एक प्यार का नगमा हैं…’ (शोर),
सचिन गरुड यांनी, ‘मेरे देश की धरती…’ (उपकार),
अजित जगदाळे आणि वर्षा जगदाळे यांनी, ‘मेहबूब मेरे मेहबूब मेरे…’ (पत्थर के सनम)’ महेंद्र गायकवाड यांनी, ‘जिंदगीकी ना तुटे लडी…’ (क्रांती),
सुरेश कंक यांनी, ‘तेरी याद दिल से भुलाने चला हूं…’ (हरियाली और रास्ता), शामराव सरकाळे यांनी, ‘आदमी हूं आदमी से प्यार करता हूं…’ (पहचान),
राजेंद्र पगारे यांनी, ‘चांद सी मेहबूबा हो मेरी…’ (हिमालय की गोद में), महेश बिरदवडे यांनी, ‘लग जा गले के फिर ये…’ (वह कौन थी) अशा वैविध्यपूर्ण भावभावनांचा परिपोष करणार्या गीतांच्या माध्यमातून मनोजकुमार यांच्या रूपेरी पडद्यावरील सप्तरंगी कारकिर्दीचे मनोज्ञ दर्शन उपस्थितांना घडविले.
‘मनोजकुमार यांचे चित्रपट जाज्वल्य देशभक्तीचे होते. सहकुटुंब पहावे असे होते. आजही देशाच्या स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनी मनोजकुमार यांच्या चित्रपटातील गीते सादर होतात. आपल्यातील देशभक्तीचे स्फुलिंग जागवतात.’ असे मत समरसता साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष कैलास भैरट यांनी व्यक्त केले.
तानाजी एकोंडे प्रास्ताविक करताना म्हणाले की,
‘नसानसांत देशभक्ती दौडावी म्हणून शब्दधन काव्यमंच ही संस्था क्रांतिकारकांना अभिवादन करीत असते म्हणूनच देशभक्त मनोजकुमार यांच्या आदरांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला आहे.’
अविनाश कंक, मोहिनी गरुड, विद्या कंक, मुग्धा कंक, साक्षी गायकवाड, अपर्णा कंक, उषा कंक, अनिरुद्ध कंक यांनी संयोजन केले. प्रदीप गांधलीकर यांनी मैफलीचे निवेदन केले. मुरलीधर दळवी यांनी आभार मानले.




















