माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे पाटील यांचे निधन

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील तसेच माऊली मंदिरातील श्रींचे मानकरी गणपतराव नारायणराव कुऱ्हाडे पाटील यांचे अल्पशा आजाराने रविवारी ( दि. १६ ) निधन झाले. त्यांचे मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून, नातवंडे, पुतणे, चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे.
माजी नगराध्यक्ष विलासराव कुऱ्हाडे पाटील, माऊलींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे यांचे ते चुलते तसेच पत्रकार सामाजिक कार्यकर्ते दिनेश कुऱ्हाडे पाटील यांचे ते वडील होत. गणपतराव कुऱ्हाडे पाटील यांनी माऊलींचे पालखी सोहळ्यात अनेक वर्ष वारी करीत वारकरी संप्रदायाचा वारसा चालविला. श्रींचे पालखी सोहळ्यात चवरीचे ते मानकरी होते. त्यांनी इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्तीसाठी पाठपुरावा केला असून कीर्तन, प्रवचन,अखंड हरिनाम सप्ताहात इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्तीसाठी मार्गदर्शन, आणि इंद्रायणी आरती साठी कायम आग्रही भूमिका मांडली. इंद्रायणी नदी स्वच्छता, आरतीचे उपक्रमात त्यांचा नेहमी सहभाग होता. त्यांचे जाण्याने एक समाजशील मनाचे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. आळंदीतील आळंदी जनहित फाउंडेशन, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान, इंद्रायणी आरती ग्रुप, आळंदी ग्रामस्थ यांचेसह विविध सेवाभावी संस्थांचे वतीने शोक व्यक्त करीत श्रद्धांजली समाज माध्यमातून अर्पण करण्यात आली. शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर आळंदीतील इंद्रायणी नदी काठावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे अंत्यविधीस समाजाचे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.









