महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी आणि कठोर उपाययोजनांची अमंलबजावणी करा! युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव यांचे तहसीलदारांना निवेदन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशात किंवा राज्यात ज्यावेळी एखादी महिला अत्याचाराची घटना घडते त्यानंतरच सरकारच्या सर्व सरकारी यंत्रणा तसेच पोलीस यंत्रणा खडबडून कामाला लागतात. मात्र या घटना घडूच नयेत यासाठी काही कठोर उपाययोजनांची कायमस्वरूपी अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे असून किमान बदलापूरमधील घटनेनंतर तरी पिंपरी चिंचवड शहरासाठी गांभीर्याने पावले उचलली जावीत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी हवेलीचे तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे केली आहे.
बदलापूर येथे घडलेल्या अतिशय संतापजनक घटनेनंतर संपूर्ण राज्यभर उद्रेक पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षांपासून सर्वसामान्य नागरिकही या घटनेबाबत रस्त्यावर उतरलेला दिसत आहे. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हवेलीचे तहसीलदार जयराज देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.
याप्रसंगी जिल्हा काँग्रेस अनु.जा. विभाग अध्यक्ष हिरामण खवळे, जिल्हा सरचिटणीस कुंदन कसबे, सेवादल माजी अध्यक्ष मकरध्वज यादव, युवक प्रवक्ते विशाल कसबे, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष प्रतिक जगताप, भोसरी विधानसभा युवक अध्यक्ष जमीर शेख, ऋषिकेश जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनात बदलापूर घटनेचा निषेध नोंदवत या घटनांना आळा घालण्यासाठी त्यांनी काही उपाययोजना सुचविल्या आहेत. यामध्ये पोलीस गस्त वाढविणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, हेल्पलाईन नंबर जागरूकता, शहरातील सर्व शाळांमध्ये गुड टच, बॅड टच उपक्रम राबविणे, स्वसंरक्षण कार्यशाळा, महिलांच्या फोन कॉल्सला तातडीने प्रतिसाद देणे इ. उपाययोजना निवेदनात सुचविल्या आहेत.
मात्र या उपाययोजनांची कायमस्वरूपी व कठोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.









