महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजलं, २० नोव्हेंबरला मतदान, २३ नोव्हेंबरला निकाल

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत आज झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक तारखांची घोषणा केल्याने आजपासून राज्यात आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे.
राजीव कुमार यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे:
– महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार असून राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. यामध्ये २३४ सर्वसाधारण मतदारसंघ असून २५ मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी तर २९ मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.
– मतदार हेल्पलाइनच्या आधारे मतदार आपल्या मतदान केंद्रासह इतर माहिती मिळवू शकतात.
– मतदान केंद्रांवर मतदारसंघांसाठी पाण्यासह विविध सुविधा उपलब्ध केल्या जातील.
– निवडणूक काळात पैशांचा गैरवापर होऊ नये, यासाठी विविध ठिकाणी पथकाद्वारे तपासणी केली जाईल.
– ज्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यांना आपल्याबाबत तीनदा वृत्तपत्रांतून माहिती द्यावी लागेल.
दरम्यान, राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांमध्ये पडलेल्या फुटीनंतर होत असलेली ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. तसंच महायुती आणि महाविकास आघाडी या नावांनीतयारी झालेल्या नव्या राजकीय समीकरणांचाही या निवडणुकीत कस लागणार आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार असून यामध्ये कोण बाजी मारणार, याबाबत देशभरात उत्सुकता आहे.
निवडणूक कार्यक्रमाविषयी माहिती देताना राजीव कुमार म्हणाले की, “महाराष्ट्र विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस २९ ऑक्टोबर हा असेल, तर ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. उमेदवारांना ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. “









