महात्मा फुले महाविद्यालयात ‘ भारतीय ज्ञान प्रणालीचा साहित्यावरील प्रभाव ’ वर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

पिंपरी ,( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात मराठी, हिंदी, इंग्रजी आणि आय.क्यू.ए.सी.विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘ भारतीय ज्ञान प्रणालीचा साहित्यावरील प्रभाव ’ या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली .या परिषदेचे प्रास्ताविक डॉ.मृणालिनी शेखर यांनी केले. परिषदेचे उद्घाटन प्रो.डॉ. सदानंद भोसले ( हिंदी विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे )यांच्या हस्ते झाले. आपल्या उद्घाटनपर भाषणात मा.प्रो.डॉ.सदानंद भोसले यांनी हिंदी साहित्याच्या माध्यमातून भारतीय ज्ञान प्रणालीचा साहित्यावर पडलेला प्रभाव उलगडून दाखविला.या परिषदेचे बीजभाषण मा.भास्कर हांडे ( वैश्विक आर्ट एनव्हायरनमेंट ऑर्गनायझेशन, नेदरलँड्) यांनी केले. मा.भास्कर हांडे यांनी मराठी साहित्याच्या माध्यमातून प्राचीन , मध्ययुगीन आणि अर्वाचीन कालखंडापासून भारतीय ज्ञान प्रणालीचा भारतीय साहित्यावर कसा प्रभाव पडत गेला याची आपल्या विवेचनातून साधार मांडणी केली.परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.माधव सरोदे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून ही परिषद घेण्यामागचे कारण सांगताना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी करताना भारतीय ज्ञान प्रणालीचा संबंध प्रत्येक विषयाशी कशा प्रकारे येतो हे विशद करत या विषयावर सद्य:स्थितीत चर्चा करणे गरजेचे आहे हे सांगत या परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या.
या परिषदेमध्ये प्रो.डॉ.प्रमोद आंबेकर ( प्रमुख, मराठी विभाग, एम.जी.व्ही.आर्ट्स, सायन्स, आणि कॉमर्स कॉलेज, मनमाड ) , डॉ. मनीषकुमार मिश्रा ( अतिथी प्राध्यापक, दक्षिण एवं दक्षिण पूर्वी भाषा विभाग, ताश्कंद स्टेट युनिवर्सिटी ऑफ ओरिएन्टल स्टडीज, उजबेकिस्तान ( रुस ), प्रो.डॉ.शिवाजी सरगर (प्रमुख, इंग्रजी विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई ) या मान्यवरांचे अनुक्रमे भारतीय ज्ञान प्रणाली आणि मराठी साहित्य, भारतीय ज्ञान परंपरा एवं हिंदी साहित्य, भारतीय ज्ञान पद्धती आणि इंग्रजी साहित्य या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्याने झालीत. आपल्या व्याख्यानांमधून मान्यवर तज्ज्ञांनी भारतीय ज्ञान प्रणालीचा मराठी, हिंदी ,इंग्रजी या भाषांमधील साहित्यावर पडलेला प्रभाव विविध साहित्यकृती , भाषेच्या कालखंडांच्या माध्यमातून उलगडून दाखवीत भारतीय ज्ञान प्रणालीचे महत्त्व अधोरेखित केले.
मान्यवरांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनपर व्याखानानंतर डॉ.शहाजी कारंडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रातिनिधिक स्वरुपात सहभागी संशोधकांनी आपल्या पेपर्सचे वाचन केले. संशोधकांच्या पेपर वाचनानंतर डॉ.शहाजी कारंडे यांनी सहभागी संशोधकांच्या वाचलेल्या पेपर्सवरती आपले मनोगत व्यक्त केले.
आय.क्यू.ए.सी.विभागाचे प्रमुख डॉ.नीलकंठ डहाळे यांनी शेवटी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन श्री.अविनाश शेळके आणि रीमा बात्रा यांनी केले. तंत्रसहाय्य बी.बी.ए.सी.ए.च्या प्रमुख प्रीती नेवसे यांनी केले.









