चिंचवडताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

निर्धार मेळाव्यात जनतेच्या न्यायालयात दाद मागणार – भाऊसाहेब भोईर

Spread the love

 

भोईर यांचा लढण्याचा निर्धार, पत्रकार परिषदेतून केली भूमिका जाहीर

२ ऑक्टोबर रोजी निर्धार मेळाव्यात करणार राजकीय भूमिका स्पष्ट

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- संपूर्ण ताकदीनिशी मी चिंचवड विधानसभेच्या रणांगणात उतरणार असून या निवडणुकीत माझा पक्ष हा माझा मतदारच ठरवतील. जनतेच्या दरबारातच मी न्याय मागणार असून माझ्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे दरवाजे उघडे आहेत,  अशी राजकीय भूमिका  भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाऊसाहेब भोईर बोलत होते.कित्येक वेळा राजकारणात ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच जवळ बसून माझा कार्यक्रम केला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी आपली खंत व्यक्त केली

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना भोईर म्हणाले की, राजकारणात काम करत असताना हक्क असतानाही माझ्यावर वारंवार अन्याय करण्यात आला. कित्येक वर्षे चिंचवड विधानसभेत भावी आमदार म्हणून माझ्याकडे पाहण्यात आले. परंतु राजकीय अनैतिक खाचखळगे न जमल्याने आणि विरोधकांच्या आर्थिक गणितांपुढे कमी पडल्याने माझा पराभव झाला. २ ऑक्टोबर रोजी रहाटणी येथील थोपटे लॉन्समध्ये होणाऱ्या महानिर्धार मेळाव्यात मी माझी पुढची राजकीय भूमिका जनतेच्या साक्षीनेच स्पष्ट करेन, असेही भोईर यावेळी म्हणाले.

चिंचवड विधानसभेमध्ये असलेल्या घराणेशाही आणि दडपशाहीमुळे या मतदार संघात विकासाचे केंद्रीकरण होऊ शकले नाही. केवळ स्वतःच्या राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या सत्तेचा वापर केलाय. मला वैयक्तिक कोणावरही टीका करायची नसली तरी जनतेला सर्व वस्तुस्थिती माहिती आहे. आणि त्यामुळेच या मतदारसंघातील जनतेला आता बदल हवा आहे. त्यांच्या पाठींब्यावरच या निवडणुकीत मी उतरणार असून मोरया गोसावींची भक्ती आणि चापेकरांची क्रांती हेच माझे ध्येय असल्याचेही भाऊसाहेब भोईर यावेळी म्हणाले.
या सर्व परिस्थितीचा विचार करुन माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावर आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे निश्चित केल्याचे भोईर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मतदार संघात मतदारांची संख्या वाढली. मात्र, समस्या जैसे थे च आहेत. त्यामध्ये २४ तास पाणी पुरवठ्याचा प्रश्न असू द्या, वाढती वाहतूक कोंडीची समस्या असो की घन कचरा व्यवस्थापन, याकडे आत्तापर्यंत इथल्या सत्ताधाऱ्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलं आहे.
हेच प्रश्न घेऊन मी मतदारांच्या पाठींब्यावर या निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय. मोरया गोसावींची भक्ती  हाच माझा पक्ष आणि चाफेकरांची क्रांती हे माझं ध्येय असल्याचे भोईर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button