Spread the love

 

बारणे यांच्या हॅटट्रिकसाठी कामगार तसेच रिक्षा व टॅक्सी चालक-मालकांचा निर्धार

विरोधकांनी आंबेडकर वाचलेच नाहीत – बारणे

पनवेल, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नरेंद्र मोदी हे सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणारे पंतप्रधान आहेत, असे उद्गार मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (रविवारी) काढले.

नवीन पनवेल येथील खांदा कॉलनीमध्ये झालेल्या कामगार, रिक्षा व टॅक्सी चालक-मालक यांच्या मेळाव्यात खासदार बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देऊन हॅटट्रिक करण्याचा निर्धार करण्यात आला. त्यावेळी बारणे बोलत होते.

व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे, माजी महापौर कविता चौतमोल तसेच अनिल भगत, एकनाथ गायकवाड, प्रथमेश सोमण, परेश पाटील, रवींद्र नाईक, शिवाजीराव थोरवे, जितेंद्र घरत आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले की, उज्वला योजना ते किसान सन्मान योजनेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांचा विचार केला आहे. गोरगरिबांना मोफत धान्य, आदिवासी भागात, खेडोपाड्यात रस्ते, वीज, घरोघर पाणी, शौचालय, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना घरे, आरोग्य विमा कवच अशा कित्येक वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवल्या आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जतन करण्याचे मोठे काम केंद्रातील व राज्यातील सरकारने केले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. विरोधक केवळ डॉ. आंबेडकर यांचे नाव वापरतात, पण त्यांनी डॉ. आंबेडकर यांचे चरित्र, विचार, साहित्य कधीही वाचलेले नाही. डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेली घटना बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विरोधकांकडून विनाकारण संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे, असा आरोप बारणे यांनी केला.

सलग सात वेळा संसद रत्न पुरस्कार मिळवून खासदार बारणे यांनी संपूर्ण देशात मावळ मतदारसंघाची शान वाढवली आहे, असे आमदार ठाकूर म्हणाले. देशातील प्रत्येक घटकासाठी पंतप्रधान मोदी यांनी काही ना काही काम केले आहे. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाला सर्वमान्यता आहे, असे ठाकूर यांनी सांगितले. सर्वसामान्यांचे हित जपणारे मोदी सरकार पुन्हा येण्यासाठी खासदार बारणे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version